Thursday, October 13, 2011

महागाई आणि बेडूक

वेताळ ने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे तो पुन्हा राजा विक्रमादित्याच्या तावडीतून सुटून झाडावर जाऊन बसत असे. पण, धैर्य आणि पराक्रम अंगी असल्यामुळे कंटाळा, आळस झटकून राजा पुन्हा वापस गेला आणि वेताळला घेऊन नगराच्या दिशेने चालू लागला. बरयाच वेळ शांतपणे चालत असताना वेताळने राजाला पुन्हा एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला बेडकांचा आवाज आला. त्यावर वेताळ म्हणाला, ‘‘राजा आज मी तुला एक प्रश्न विचारतो, जो या बेडकांशी संबंधित आहे.'' दोन मित्र होते. जे सतत विज्ञानाचे नवीन प्रयोग करीत असे. बेडकासोबत प्रयोग करीत असताना एका मित्राने बेडकाला उकळत्या पाण्यात टाकले. त्याच सुमारास दुसरा मित्र वेगळा प्रयोग करीत होता. त्याने प्रथम बेडकाला साध्या पाण्यात टाकले. मग त्या पाण्याला त्याने गरम करायला सुरुवात केली. हळूहळू ते पाणी गरम होऊ लागले आणि थोड्याच वेळाने त्या भांड्यातले पाणी उकळू लागले. इतकी गोष्ट सांगून वेताळने राजाला विचारले, ‘‘राजा दोन्ही बेडकं हे उकळत्या पाण्यात आहे. त्यात असलेल्या बेडकांचं काय झालं असेल. मला या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा तुझ्या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील.''

या वेळेस मात्र राजा विचारात पडला. दोन्ही बेडूक एकाच परिस्थितीत आहे. फक्त त्या परिस्थितीपर्यंत ते वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले आहेत. दोन्ही बेडकं मेली असावीत, असा त्याचा विचार झाला. पण, अचानक त्याला inflation (महागाई वाढी चा दर) आणि त्यामुळे त्याच्या होणाऱ्या परिणामांची आठवण झाली आणि तो बोलू लागला.

वेताळ, ह्या प्रयोग मुळे मला महागाई वाढीचा दराने त्रासलेल्या, पण त्याकरिता गुंतवणुकीत कुठलेच बदल न करणारया गुंतवणूकदाराची आठवण आली. खरं तर दोन्ही प्रयोगांमध्ये बेडूक उकळत्या पाण्यात आहे त्यामुळे साहजिकच असं वाटेल की, दोन्ही बेडूक मेले असावेत, पण ते बरोबर नाही. पहिल्या प्रयोगात जेव्हा बेडकाला सामान्य तापमानातून उकळत्या पाण्यात टाकलं त्या वेळेस एकदम झालेला बदल बेडकाच्या लक्षात येईल आणि तो उडी मारून भांड्याच्या बाहेर येईल किवा तसा प्रयत्न सतत करेल आणि कदाचित यशस्वी होऊन जिवंत राहील. दुसऱ्या प्रयोगात मात्र बेडूक शांत आहे. कारण, तो सामान्य तापमानाच्या पाण्यात आहे. त्या वातावरणाची / तापमानाची त्याला सवय झाली असेल. तापमानात अतिशय हळू बदल केल्यामुळे त्यातले बदल त्याच्या लक्षात येणार नाही. ज्या पाण्यात तो आधीपासून आहे त्यात अचनाक मोठा बदल झाला नसल्यामुळे गरम होत असलेलं पाणी हेच सामान्य तापमानाचं पाणी आहे या भ्रमात/विचाराने तो भांड्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करणार नाही. पण, जेव्हा पाणी उकळायला लागेल आणि तापमान असह्य होईल त्या वेळेस मात्र बेडूक निश्चितच मरेल.

Inflation हे एक असंच हळूहळू गरम होणारं पाणी आहे, ज्यात सामान्य जनता/गुंतवणूकदार होरपळले जातात. Inflation हे एक slow poison आहे ज्याचा प्रभाव लगेच जाणवत नाही. आर्थिक क्षेत्रात मोठी घडामोड झाल्यास गुंतवणूकदार त्याचा काय प्रभाव राहील याची ऊहापोह करून बदल करीत असतो. पेट्रोल एकदम महाग झाल्यास कारऐवजी टू-व्हीलर किवा पेट्रोल कारऐवजी डिझेल कारचा वापर, असे काही उपाय करीत असतो. पण या गोष्टी/मोठे बदल वारंवार होत नसतात. पण, दैनंदिन वापराच्या गोष्टींची भाववाढ ही सतत होत असते आणि त्याचा बदल खूप मोठा नसतो, पण जसा जसा काळ वाढत जातो त्याचा प्रभाव जाणवू लागतो.

Particular

Prices 2001-02

Prices 2010-11

% Change

Sugar (1 Kg)

16

40

9.60%

Cooking Oil (5 Ltrs)

290

450

5%

Rice (Per Kg)

14

40

11.07%

Pulses (Per Kg)

20-30

50-80

10.31%

Wheat (Per Kg)

10

25

11.70%

Detergent

23

70

11.70%

Soap (Personal Care)

7

18

9.90%

Petrol (1 Ltr)

34

75

8.23%

सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे दैनंदिन गरजेच्या काही निवडक वस्तूंच्या किमतीत वाढ सरासरी ६-१२ टक्के प्रती वर्ष या दराने झाली आहे. ज्या व्यक्तीचे उत्पन्न यापेक्षा जास्त आहे त्यांना याचा विशेष प्रभाव जाणवणार नाही. पण ज्या व्यक्तींचे पगार/उत्पन्न दरवर्षी यापेक्षा जास्त नाही वाढले किवा जे फक्त गुंतवणूकीवर मिळणारया परताव्यांवर अवलंबून आहे त्यांना महागाईचा चटका निश्चितच जाणवला असेल. गेल्या १० वर्षांत बँक फिक्स डिपॉझिटचे व्याज दर ६-१० टक्के या दरम्यान होते.सरासरी याला ८ टक्के प्रती वर्ष धरू या. गुंतवणुकीवर टॅक्स वगळून मिळणारे परतावे हे Inflation पेक्षा जास्त हवे अन्यथा काही काळाने मूळ रक्कम सुद्धा खर्चाच्या कामी वापरावी लागेल.

सोबत दिलेला तक्ता हा फक्त निवडक वस्तूंशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त अश्या अनेक वस्तू/सेवा आहेत ज्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे आणि त्या वस्तू/सेवांचा उपयोग प्रत्येक व्यक्ती करीत असतो. उदाहरणार्थ शाळेची फी, शिक्षण साहित्याच्या वस्तू, औषधे, वीज, पाणी इत्यादी. यांची भाववाढ निश्चित भरपूर झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक ऐक्छिक गोष्टी आहेत ज्यात आज आपण खर्च करत असतो जो आता आवश्यक झाल्यात जमा आहे सोशल स्टेटस् जपायच्या नादात सुद्धा अनेक अनावश्यक खर्च करावे लागतात जे आधीच भरमसाट वाढलेल्या खर्चाच्या आगीत तेल ओतण्यासारखं आहे. एक गुंतवणूकदार या नात्याने प्रत्येक व्यक्तीने महागाईच्या या हळूहळू प्रमाणात गम होत जाणारया पाण्यापासून सावध व्हावे. आपण केलेली गुंतवणूक ही inflation ला मात देऊ शकते अथवा नाही याचा विचार करणं आवश्यक आहे. सगळ्या स्तरावर बदल होत असताना गुंतवणूकीत सुद्ध बदल आवश्यक आहे. आजपर्यंत आपण स्वत: गुंतवणूक केली. सुरक्षित आणि ठरावीक (सेफ अ‍ॅण्ड स्टेबल) परतावे देणारया गुंतवणूकीकडे आपला कल होता पण बदलेल्या परिस्थितीचे नीट आकलन होण्याच्या दृष्टीने योग्य सल्लागाराची निवड करून त्याचा साहाय्याने प्लॅनिग करणे आवश्यक आहे जेणेकरून महागाईच्या चटक्याचा प्रभाव जाणवणार नाही. राजाच्या या बोलण्यावर वेताळ हसला आणि म्हणाला, ‘‘राजा तुझ्या या अतिशय प्रासंगिक आणि सडेतोड उत्तराने मी प्रसन्न झालो. पण, तू मात्र बोललास त्यामुळे महागाईचे नाही, तर मला पुन्हा वापस आणायचे कष्ट करावे लागतील. मी चाललो.

नोट: वर सांगितलेल्या प्रयोगाला Boiling Frog Syndrome असेही म्हणतात. काही वैज्ञानिकांच्या मते दुसऱ्या प्रयोगातील बेडूक सुद्धा बाहेर उडी मारेल आणि वाचेल. पण, छोटे बदल अपेक्षित असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बदल न केल्या ने मोठं नुकसान होऊ शकतं याकरिता सहसा हे उदाहरण देण्यात येतं.

Thursday, September 15, 2011

२१ मोदकांचा प्रसाद

नुकतेच गणरायाचे विसर्जन झालेले आहे. एक गुंतवणुकदार या नात्याने आपण काय करू शकतो आणि काय करायला नको, याचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरेल. तर या मंगल समयी विघ्नहर्त्याचे स्मरण करून गुंतवणुकीत भरपूर यश मिळेल, अशी प्रार्थना करू आणि प्रसादाचे २१ मोदकरूपी नियम ग्रहण करू.

१) प्रथम तुला वंदीतो... सर जॉन टेम्पलटन यांनी गुंतवणुकीचे अतिशेय सोपे असे काही नियम सांगितले आहेत, त्यानुसार देवाला स्मरून गुंतवणुकीची सुरवात केल्यास गुंतवणुकदार चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो आणि त्यात चुकण्याची संभावना कमी होते.

२) होमवर्क व्यवस्थित करा आणि तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणूक करायच्या आधी त्या करिता लागणारं होमवर्क आणि प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यात गुंतवणूक सल्लागार किंवा फायनांशियल प्लानर यांचा सल्ला मोलाचा ठरेल. ज्याप्रमाणे औषधांची अनेक दुकानं असून सुद्धा आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्याचप्रमाणे फायनांशियल प्लानरच्या मदतीने योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास यश निश्‍चितच मिळेल.

३) ज्याप्रमाणे डॉक्टरांच क्वालिफिकेशन किंवा अनुभव रोग निदानाकरिता महत्त्वाच ठरतं, त्याचप्रमाणे तुम्ही निवड केलेल्या फायनांशियल प्लानरची विश्‍वासहार्तता, अनुभव हे महत्त्वाचं आहे. अत्यंत कष्टाने कमावलेल्या आपल्या पैश्यांची जबाबदारी आपलीच आहे, त्यामुळे ते योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच गुंतवायला हवे.

४) खर्च कमी करा : सोपा आणि छोटा नियम पण अवलंबन करायला अतिशय कठीण. पण थोडा विचार करा- ५०००/- महिना खर्च कमी करणं सोप आहे अथवा ५,०००/- महिना उत्पन्न वाढवण? समजा रेट ऑफ रिटर्नस १० टक्के असल्यास किमान ६ लाखांची गुंतवणूक हवी जेणे करून त्यावर ५,०००/- मासिक उत्पन्न मिळेल. खर्चावर ताबा मिळवल्यास साहजिकच उत्पन्नात वाढ झाल्यासारखे फायदे मिळतील.

५) Start early, Save regularly - लवकर आणि नियमित गुंतवणूक केल्यास मार्केटच्या चढउतारीचा फायदा घेता येतो. ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे कासवासारखी चिकाटी असणे कधीही फायद्याचे राहील.

६) आरोग्य विमा - आजच्या या आधुनिक युगात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. त्यामुळे एका सामान्य भारतीय व्यक्तींच आयुष्यमान वाढलं आहे. पण त्यासोबतच अनेक रोग आजार मागे लागले आहे. योग्य आरोग्य विमा नसल्यास आणि खर्च भरमसाठ वाढल्यामुळे अनेक गुंतवणुका हॉस्पिटल बिल फेडण्याच्या कामी येतात. उपचाराकरिता गुंतवणूक बंद करायची दुर्दैवी स्थिती येऊ नये, याकरिता आरोग्य विमा हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

७) जीवन विमा - इन्श्यूरन्स हा एक खर्च आहे. त्यामुळे त्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने पैसे लावू नये. ज्याप्रमाणे आपण गाडीचं इन्श्युरन्स करतो, त्याचप्रमाणे लाईफ इन्श्यूरन्स विकत घ्यावा. कमीत कमी खर्चामध्ये (अर्थात प्रिमीयम) जास्तीत जास्त लाभ (विमा रक्कम) कसा घेता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. त्याकरिता टर्मप्लान/रिस्क इन्श्यूरन्स हे सर्वात महत्त्वाचं ठरतं.

८) इन्फ्लेशन : इन्फ्लेशन किंवा महागाई वाढीचा दर हा सर्वात मोठा टॅक्स आहे. पण बहुतांश वेळा त्याचा प्रभाव गुंतवणुकदाराच्या लक्षात येत नाही. टॅक्स दिल्यानंतर मिळालेले परतावे हे गुंतवणुकदाराचे खरे परतावे आहे. ज्याप्रमाणे गुतंवणुकीत चक्रवाढ पद्धती लागू होते, त्याचप्रमाणे महागाई वाढीच्या दरात पण दरवर्षी वाढ होत आहे. प्रत्येक गुंतवणुकीतले परतावे इन्फ्लेशनला मात देऊ शकत नाही. पण पोर्टफोलियोमधे अशा गुंतवणुकी जरूर असायला हव्या. ज्यात परतावे इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहे.

९) गुंतवणुकदार बना, ट्रेडर नव्हे - योग्य विचार करून, व्यवस्थित अभ्यास करून आणि लॉंग टर्मकरिता गुंतवणूक करा. नेहमी लक्षात असू द्या Rule of Compounding च्या नियमा प़माणे जास्त कालावधी करिता केलेल्या गुंतवणुकीत फायदा जास्त होतो. शेअर्स किंवा म्युचल फंडमध्ये नेहमी फेरफार/ट्रेडिंग केल्यास फक्त शेअर ब्रोकर किंवा म्युचलफंड एजेंटचा फायदा होईल, तुमचा नाही.

१०) भेडचाल नको - प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती, त्याची रिस्क घेण्याची क्षमता आणि अपेक्षित फायनांशियल गोल वेगळे असतात. त्यामुळे सगळे मित्र/नातेवाईक एका पद्धतीने/एका प्रकारात गुंतवणुक करतात म्हणून मी पण तिथेच गुंतवणुक करीन हा विचार बरोबर नव्हे. स्वत:ला योग्य राहील आणि व्यवस्थित परतावे अनावश्यक रिस्क न घेता मिळतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे.

११) देशाची अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकचे धोरण, जगातील देशामध्ये होणारे आर्थिक बदल, फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनालिसीस यापेक्षा महत्त्वाचं आहे गुंतवणुकदाराची स्वत:ची आर्थिक परिस्थितीची जाणीव. स्वत:ची रिस्क घ्यायची इच्छाशक्ती आणि स्वत:चे फायनांशियल गोल. जर गुंतवणुकदाराने या गोष्टींची काळजी घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा गुंतवणुकीला निश्‍चितच योग्य दिशा मिळेल.

१२) डायवर्सिफीकेशन - सगळ्या गुंतवणुकी एकाच प्रकारच्या एसेट क्लासमध्ये केल्यास रिस्क वाढते. त्यामुळे गुंतवणुकदाराने वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूक करावी, जेणेकरून पोर्टफोलियोची रिस्क तर कमी होईलच, सोबतच परतावे बरेच स्थिर होतील. निश्‍चित परतावे देणारे प्रॉडक्टस अर्थात डेट इन्व्हेस्टमेंट तसेच शेअर्स इत्यादिचा सहभाग असलेल्या पोर्टफोलियोमध्ये गुंतवणुकदाराला चांगला परतावा कमी रिस्क घेऊन मिळू शकतो.

१३) पारदर्शिता - गुंतवणूक केल्यास कमी जास्त परतावे हे त्याचा अविभाज्य भाग आहेच. पण हे परतावे कसे येतात, हे माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही गुंतवणूक परिपूर्ण नसते. एखाद्या गुंतवणुकीत परतावे कमी तर कुठे लिक्वीडिटी नाही तर कुठे त्यावर टॅक्स जास्त बसतो. पण नेहमी लक्षात असू द्या, गुंतवणुकीचे परतावे कसे येतात आणि जोवर त्याचे लॉजिलक उत्तर मिळत नाही, तोवर त्यात गुंतवणूक करू नये.

१४) आयकर सवलती - टॅक्स वाचतो किंवा एखाद्या गुंतवणूक प्रकारात आयकरात सूट मिळते फक्त या एकमेव कारणाकरिता गुंतवणूक करणे बरोबर नव्हे. त्यातले परतावे हे महत्त्वाचे आहेतच आणि ते गुंतवणुकदाराच्या फायनांशियल गोलला अनुसरून असायला हवे.

१५) मोठ्या चुका टाळा - लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादात किंवा जास्त परताव्यांचा लोभापायी गुंतवणूक करू नये. सामान्य परतावे जास्त कालावधी करिता असणे हे कधीही फायद्याचे आहे. पण भरपूर परतावे आहे म्हणून गुंतवणूक करून मूळ रक्कमच धोक्यात घालायची हे बरोबर नव्हे. त्यामुळे जास्त परतावे तेही गॅरंटी सोबत ही धोक्याची घंटा समजावी.

१६) टी.व्ही. हे माध्यम मनोरंजनाकरिता तयार झालं आहे, त्यात माहिती, बातम्या, विश्‍लेषण या गोष्टी नंतर आल्या. फायनांशियल न्यूज चॅनल मधील सर्व माहिती बरोबरच आहे किंवा त्याचा हेतू गुंतवणुकदारांच्या फायद्याचाच आहे, हे जरूरी नव्हे. श्री गणरायाप्रमाणे ते सगळं ऐकून खरचं आपल्या हिताचा आहे का, याचं विश्‍लेष करून मगच त्यावर कृती करावी.

१७) घाबरू नका - प्रत्येक गुंतवणुकीचे काही फायदे आणि तोटे असतात. कुठलीच गुंतवणूक परिपूर्ण नव्हे. त्यामुळे एखाद्या गुंतवणुकीत तोटा झाल्यास त्याला वर्ज्य मानू नका. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, आपण काय चूक केली या बद्दल आपल्या प्लानर सोबत विचार विनिमय करा. घाबरून त्या गुंतवणुकीला वर्ज्य केल्यास त्यातले फायदे पण हातातून जातील.

१८) लोन घेऊन कधीही गुंतवणूक करू नये. बर्‍याच वेळेस असं बघण्यात येत की लोनवरच व्याज दर ९-१० टक्के आहे, पण शेअर्स/हेरिव्हेटीटजमध्ये तेजी असताना त्यात १५-२० टक्के मिऴतात आहेत. परतावे कमी-जास्त होतील, पण व्याज भरणं हे नेहमी जरुरी राहील. त्यामुळे कितीही आकर्षक वाटत असेल तरी लोन घेऊन गुंतवणूक करू नये.

१९) इक्विटी लॉंग टर्म, डेट शॉर्ट टर्म - प्रत्येक व्यक्तीचे काही फायनांशियल गोल्स हे लॉंग टर्म असतात तर काही कमी कालावधीचे असतात. सामान्यत: जेव्हा कालावधी लांब आहे, त्याकरिता गुंतवणुकीत जास्त रिस्क घेतल्या जाऊ शकते. अशा वेळेस शेअर्स/स्टॉक्स इत्यादी गुंतवणूक फायद्याची ठरेल. पण कालावधी कमी असल्यास बॉन्डस्, फिक्स डिपॉझिट इत्यादी ठिकाणी गुंतवणूक करावी.

२०) COMPOUNDING - नेहमी लक्षात असू द्या, हे जगातलं आठवं आश्‍चर्य आहे. याचा पुरेपूर फायदा घेऊन गुंतवणुकदाराने आपल्या फायनांशियल गोलकडे वाटचाल करावी. Best comes at last या नियमाप्रमाणे लांब कालावधीकरिता गुंतवणूक करावी.

२१) वर्षातून किमान एकदा तरी आपल्या सगळ्या गुंतवणुकी, इन्श्युरन्स इत्यादीचे मूल्यांकन आणि ते योग्य ठिकाणी आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थितीत बदल होतच असतो. त्यामुळे गुंतवणुकीत बदल करण्याची आवश्यकता असल्यास आपल्या फायनांशियल प्लानर सोबत बसून, त्याचे नियोजन वर्षातून एकदा तरी करायलाच हवे.